नाशिक – विशेष प्रतिनिधी
भद्रकाली पोलीस ठाण्यातील दुय्यम निरीक्षक मनोहर कारंडे यांची इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यासाठी ३५ लाखांची मागणी तर मालेगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस अंमलदार व सहकाऱ्याला ‘एलसीबी’ मध्ये नियुक्ती करण्यासाठी दोन लाख रुपये उकळण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. यामुळे पोलीस दलातील नियुक्तीसाठी आर्थिक उलाढाल होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले असून पोलीस तपासातून नेमके कोणते सत्य बाहेर येते, याकडे शहर व ग्रामीण पोलिसांचे लक्ष लागलेले आहे.
मुंबई नाका पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे गंभीर व अतिशय गुंतागुंतीचे असल्याचे फिर्यादीवरून दिसत आहे. पोलीस निरीक्षक नियुक्ती प्रकरणात
नितीन चंद्रकुमार सपकाळे (वय ४३, सप्तश्रृंगी कॉलनी, डी. के. पान स्टॉप, मालेगाव) व सागर बाळासाहेब पांगरे पाटील (वय ३५, रा. पांगरे मळा भुजबळ फार्मजवळ, सिडको) हे संशयित आहे. तर दुसऱ्या गुन्ह्यात केवळ पांगरे पाटील संशयित असून फिर्यादी व मित्र नितीन सपकाळे यांना ‘एलसीबी’ अर्थात स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्ती देण्याचे सांगून दोन लाख रुपये खंडणी स्वरुपात घेण्यात आले. म्हणजेत नितीन सपकाळे हा ग्रामीण पोलीस दलात नियुक्तीला असून पांगरे पाटील याच्याबाबत खुलासा होऊ शकलेला नाही.
नाशिकरोड पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले
प्रशांत शेखर नागरे याच्या तक्रारीनुसार, संशयित नितीन सपकाळे व सागर पांगरे पाटील यांनी संगनमताने ओळख असल्याचे भासवले. नागरे यांना चांडक सर्कल भागात समक्ष भेटले. आपली
वरपर्यंत ओळख असल्याचे भासवून भद्रकाली पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनोहर कारंडे यांची बदली करू शकतो, असे भासवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ३५ लाखांच्या खंडणीची मागणी करत फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
दुसऱ्या गुन्ह्यात पोलीस अंमलदार गौतम भिकन बोराळे (वय ३७, नेमणूक मालेगाव शहर पोलीस ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित
सागर बाळासाहेब पांगरे पाटील (वय ३५, रा. पांगरे मळा, भुजबळ फार्मजवळ, सिडको) याने
फिर्यादी व फिर्यादीचा मित्र नितीन सपकाळे यांना स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण येथे बदली करून देतो असे खोटे अश्वासन देवून वेळोवेळी दोन लाख रुपये खंडणी स्वरूपात घेवून फसवणूक केली. तसेच आणखीन एक लाख रूपये न दिल्यास तुमची कोठेही बदली करून नुकसान करण्याची धमकी दिली.
उपर देणे पडते है !
पोलीस आयुक्तालयात २५ वर्षांपूर्वी आयुक्तपदाची धुरा सांभाळणारे तत्कालीन पोलीस आयुक्त यांनी नाशिकच्याच आरोग्य मंत्र्याशी वाद घालताना ‘उपर देणे पडते है’, असे कथित उद्गार काढले होते. हा वाद तेव्हा बराच गाजला होता. त्यानंतर आता मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातही ‘वरपर्यंत ओळख’ हा परवलीचा शब्द वापरण्यात आल्याने यातील गूढ वाढले आहे. यातील एका गुन्ह्यातील फिर्यादी हा नाशिकरोड व अंबड पोलीस ठाण्यात ‘सुभेदारी’ करत असल्याची चर्चा दस्तूरखुद्द पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे या प्रकरणाने पोलिसातील ‘सुभेदारी’ व्यवस्था पुन्हा ऐरणीवर आली आहे. पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या सुभेदारांच्या मर्जीनुसारच होतात, असे आरोप यापूर्वीही झाले असल्याने या दोन्ही गुन्ह्यांची सखोल चौकशी होऊन यातील ‘मास्टरमाईंड’ शोधण्याचे आव्हान आता पोलिसांसमोरच उभे ठाकले आहे.

























