पंचवटी । विशेष प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके) यांनी स्वपक्षीयांना डावलून उबाठा गटाच्या नगरसेवकांची पाठराखण केल्याचा खळबळजनक आरोप भाजप नगरसेविका सौ. प्रियंकाताई माने यांनी केला आहे. महापौरांच्या या भूमिकेचा प्रभाग ३ मधील लोकप्रतिनिधींनी जाहीर निषेध केला असून, यामुळे सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.
हंडा मोर्चाद्वारे वेधले लक्ष
प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त आहेत. या प्रभागाच्या हक्काच्या ‘निलगिरी वाघ जलशुद्धीकरण केंद्रातून’ उपलब्ध असलेले पाणी जाणीवपूर्वक द्वारका परिसराकडे वळवले जात असल्याचा आरोप रहिवाशांकडून होत आहे. या अन्यायाविरुद्ध नगरसेविका प्रियंकाताई माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पहाटे ४ वाजता जलशुद्धीकरण केंद्रावर आंदोलन केले होते, तसेच महासभेत ‘हंडा मोर्चा’ काढून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
प्रशासनाचा निर्णय महापौरांनी फिरवला?
आंदोलनानंतर प्रशासनाने द्वारका परिसराचा पाणीपुरवठा दिवसातून एक वेळ करून प्रभाग ३ ला न्याय देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, महापौरांनी प्रभाग ३ मधील भाजपच्या चारही नगरसेवकांना विश्वासात न घेता, उबाठा गटाच्या नगरसेवकांच्या मागणीनुसार द्वारका परिसरात पुन्हा दोन वेळा पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश दिल्याचे समोर आले आहे. या निर्णयामुळे भाजपच्या गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपचे नाशिक महानगर उपाध्यक्ष धनंजय (पप्पू) माने यांनीही या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हक्काचे पाणी मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा इशारा माने समर्थकांनी दिला आहे. आता या वादावर पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“स्वतःच्याच पक्षाच्या नगरसेवकांवर आणि प्रभागातील जनतेवर महापौरांनी केलेला हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही. आमच्या हक्काच्या पाण्यावर हा एक प्रकारे दरोडा असून या पक्षपाती निर्णयाचा आम्ही निषेध करतो.”
— सौ. प्रियंकाताई धनंजय माने, (भाजप नगरसेविका, प्रभाग क्र. ३)

























