मुंबई –
राज्यातील दोन जिल्हा व सत्र न्यायाधीश यांना त्यांच्यावरील गंभीर आरोपांची दखल घेत एक अॉक्टोबर पासून बडतर्फ करण्यात आले आहे. सातारा जिल्हा न्यायाधीश धनंजय निकम व पालघर जिल्हा व सत्र न्यायाधीश इरफान शेख अशी बडतर्फ न्यायाधीशांची नावे आहेत.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, मुंबईतील बॅलार्ड पिअर न्यायालयात दंडाधिकारी म्हणून कार्यरत असणारे ते अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत येणारी प्रकरणे हाताळायचे. कारवाई अंतर्गत जप्त केलेल्या व मुद्देमाल म्हणून न्यायालयात हजर करण्यात आलेल्या अमली पदार्थांची ते तस्करी करत असल्याचा गंभीर आरोप उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आला होता.
बहुचर्चित कॉर्डिलिया क्रूझवरील पार्टीत शेख हे हजर होते. इतकेच नव्हे तर त्यांनी नशाही केली होती. मात्र या पार्टीवर कारवाई करणाऱ्या केंद्रीय अमली पदार्थ विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तेथून बाहेर काढले, असा आरोपही याचिकेत करण्यात आला होता. सातारा जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्याव जामीन देण्यासाठी पाच लाख रूपयांची लाच मागितल्याचा आरोप होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर निकम यांनी सत्र न्यायालयात व नंतर उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतू त्यांना दिलासा मिळाला नव्हता. याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या शिस्तपालन समितीकडून चौकशी होऊन अहवाल सादर करण्यात आला होता. या अहवालाच्या आधारे या दोन्ही न्यायधीशांवर आता बडतर्फीची कारवाई करण्यात आली असून त्यांना एक अॉक्टोबर पासून पदमुक्त होण्यास सांगितले आहे.

























