नाशिक – विशेष प्रतिनिधी
गंगापूर धरण तसेच पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधारेमुळे गोदावरीला जून महिन्यातच दुसऱ्यांदा पूर आला. दुपारी दोन वाजता गोदावरीतून ६१६० क्यूसेस पाणी वहात असल्याने गोदाघाट जलमय झाला असून लहान मंदिरे, सांडवे पुन्हा पाण्याखाली गेले आहेत.

शहर व ग्रामीण भागात यंदा पावसाचे समाधानकारक आगमन झाले आहे. त्र्यंबकेश्वरसह नाशिक शहर, गंगापूर धरण व पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू असल्याने सोमवारी सकाळी सुमारे चार हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु होता. धरणात पाण्याची आवक सुरू असल्याने दुपारी हाच विसर्ग ६१६० क्यूसेसवर पोहचला. त्यामुळे गोदाघाट जलमय झाला आहे. पावसाने उसंत न घेतल्यास विसर्ग टप्पाटप्याने वाढवला जाणार असल्याने गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली. पुराचे मापक समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या हनुमानाच्या कंबरेपर्यंत पाणी पातळी वाढली असून सांडवे व लहान मंदिरेही पाण्याने वेढले गेले. एकमुखी दत्त मंदिराच्या पायऱ्यांना पाणी लागले असून य.म. पटांगण व लगतचा परीसर पाण्याखाली गेला आहे.

























