नाशिक – विशेष प्रतिनिधी
जिल्ह्यातील माडसांगवी येथे 2 जुलै रोजी ॲड. रामेश्वर बोराडे यांच्यावर तीन अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी जिल्हा न्यायालयात वकिलांमध्ये संतप्त भावना असतानाच आता हा प्रश्न विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गाजला आहे. राज्यात वकिलांसाठी संरक्षण कायदा लागू करावा, अशी आग्रही मागणी आ. सत्यजित तांबे यांनी केली आहे.

विधान परिषदेत वकिलांवरील हल्ल्याचा प्रश्न मांडताना आ. तांबे यांनी, नाशिक जिल्ह्यातील माडसांगवी येथे दोन जुलै २०२५ रोजी ॲड. रामेश्वर बोराडे यांच्यावर तीन अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला. या अत्यंत गंभीर घटनेमुळे पुन्हा एकदा वकिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याआधी फेब्रुवारी २०२४ मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात ॲड. राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी मनीषा आढाव या वकील दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. तपासाअंती ही हत्या त्यांच्या स्वतःच्या अशिलाने केल्याचे उघड झाले.
या घटनांनंतर राज्यभरातून वकिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र कायदा करण्याची मागणी अधिक तीव्र झाली असून याबाबत मार्च २०२४ अर्थसंकल्पीय अधिवेशन तसेच डिसेंबर २०२४ हिवाळी अधिवेशन या दोन्ही अधिवेशनात आ. तांबे यांनी वकिलांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र कायदा करण्यात यावा यासाठी सातत्याने आवाज उठवला आहे.
बिहार, झारखंडसारख्या राज्यांनी वकिलांसाठी संरक्षण कायदा लागू केलेला असताना महाराष्ट्र मात्र अद्यापही दुर्लक्षित आहे. म्हणून राज्यात वकील संरक्षण कायदा तातडीने लागू करण्यात यावा, तसेच सदर वकीलांवरील हल्ल्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आज केली. यावर सभापती प्रा. राम शिंदे यांनी याबाबत सरकारला निवेदन देण्याची सूचना केली असून, सरकारने आमदार तांबे यांच्या प्रश्नावर या संरक्षण कायद्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.

























