मुंबई –
राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर विजयी जल्लोष साजरा करण्यासाठी शिवसेना ठाकरे गट व मनसे यांनी संयुक्तपणे पुढाकार घेतला आहे. मुंबईतील वरळी डोम येथे पाच जुलैस होणाऱ्या या सोहळ्यासाठी ‘वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या’…असे आवाहन राज व उद्धव या ठाकरे बंधूंनी मराठी जनांना केले आहे.
पहिलीपासून विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकवण्याचा अध्यादेश राज्य शासनाने काढला होता. या निर्णयाविरोधात मराठी आवाज बुलंद करण्यासाठी पाच जुलैस निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाचे नेतृत्वही राज व उद्धव ठाकरे करणार होते. परंतू दरम्यानच्या काळात राज्य शासनाने संबंधित अध्यादेश मागे घेतल्याने मोर्चा ऐवजी जल्लोष साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी ‘एक्स’ वर पोस्ट टाकत जल्लोषात सहभागी व्हायचे निमंत्रण दिले आहे. या पत्रिकेवर कोणत्याही पक्षाचा उल्लेख नसून केवळ राज व उद्धव ठाकरे यांची नावे आहेत. हा विजयी मेळावा शिवतीर्थावर व्हावा, अशीच आयोजकांची इच्छा होती. मात्र त्यास परवानगी मिळणार नाही ही आशंका असल्याने मुंबईतील प्रशस्त अशा वरळी डोम येथे हा सोहळ्याची तयारी सुरू आहे. आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे, असे नमूद करत तमाम मराठी जनांना जल्लोष साजरा करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

























