नाशिक – विशेष प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वरला झालेला ढगफूटी सदृश्य पाऊस तसेच शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या संततधारेमुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत गुरूवारी सकाळनंतर झपाट्याने वाढ होत आहे. गोदावरी पात्राबाहेर पडल्याने घाटावरील सांडवे तसेच लहान मंदिरे पाण्याने वेढली आहेत. नाशिकला पावसाचा ‘यलो अलर्ट’ असल्याने नाशिककरांनी काळजी घ्यायची आहे.
नाशिक शहर व ग्रामीण भागात कालपासूनच पावसाला सुरूवात झाली. त्र्यंबकेश्वर बुधवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाल्याने बाजारपेठेसह विविध भागात पाणी साचले होते. त्यामुळे भाविकांना हालअपेष्टा सहन करावी लागली. बुधवारी रात्रीनंतर शहर व लगतच्या ग्रामीण भागात संततधारेला सुरूवात झाली. त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली. रात्री सुरू झालेला पाऊस गुरूवारी दुपारपर्यंत कोणतीही उसंत न घेता सुरु होता. त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली. पुराचे मापक समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या हनुमानाच्या पायाला पाणी लागले असून सांडवे व लहान मंदिरेही पाण्याने वेढले गेले. एकमुखी दत्त मंदिराच्या पायऱ्यांना पाणी लागले असून य.म. पटांगण व लगतचा परीसर पाण्याखाली गेला आहे. रामकुंडालगत असलेल्या पार्किंगमधून तातडीने वाहने हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
संततधारेमुळे मेनरोड, दहीपूल, भद्रकाली, शालीमार, महात्मा गांधी रोड, रविवार पेठ तसेच विविध बाजारपेठांमधील उलाढाल मंदावली होती. शाळेत जाणाऱ्या लहानग्या विद्यार्थ्यांनाही संततधारेमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे अनेक भागातील वाहतूक मंदावली आहे. नाशिकरोड, सिडको, सातपूर, इंदिरानगर, देवळाली कॅम्प परिसरातही संततधार सुरूच आहे. पावसाने उसंत न घेतल्यास गोदावरीच्या पातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता असल्याने गोदाकाठचे रहिवाशी तसेच व्यापारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

























