नाशिक – विशेष प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर शहर व परिसरात बुधवारी पहाटे झालेल्या मुसळधारेमुळे गंगासागर तलाव भरला आहे. जोरदार पावसाने त्र्यंबक नगरीतील रस्ते पाण्याखाली गेले होते. तर अनेक घरे व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना भल्या पहाटे धावाधाव करावी लागली.
त्र्यंबकसह नाशिक व गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा दमदार पाऊस होत आहे. आज पहाटे पुन्हा झालेल्या मुसळधारेमुळे त्र्यंबकेश्वर मधील मेनरोड तसेच इतर भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. हे पाणी घरात व दुकानात शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली होती. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने त्र्यंबकवासियांना पावसाळ्यात हालअपेष्टांना सामोरे जावे लागते आहे.
दरम्यान नाशिक शहरातही बुधवारी पहाटे दमदार पाऊस झाल्यामुळे गोदावरी नदी पुन्हा पात्राबाहेर पडली आहे. गंगाघाटावर पाणी पातळी वाढल्याने धार्मिक विधी इतरत्र करावे लागले. त्यामुळे भाविकांची अडचण झाली. यंदाच्या पावसाळ्यात गोदावरीला दोनदा पूर आला आहे.

























