नाशिक – विशेष प्रतिनिधी
रविवारी खेळण्यासाठी गेलेल्या व त्यानंतर बेपत्ता झालेल्या विडी कामगार नगर परिसरातील तीन अल्पवयीन मुलांचा बांधकामासाठी खोदलेल्या खड्डयातील पाण्यात बुडून अंत झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. पोलीस व अग्निशमन दलाने नागरिकांच्या मदतीने शोध मोहिम राबवून तिनही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहेत. विशेष म्हणजे तिघा मृत मुलांचे नाव साई होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साई गरड, साई जाधव, साई उगले अशी तिघा मृत मुलांची नावे आहेत. त्यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढताच कुटुंबियांनी घटनास्थळी हंबरडा फोडला. यावेळी घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, साई गरड, साई मोहिते, साई उगले हे तिघेही मित्र रविवारी खेळण्यासाठी घराबाहेर पडले. मात्र त्यानंतर घरी न परतल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. याबाबत आडगाव पोलिसांकडेही बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. पोलिसांनी नजिकच्या लॉन्स व इतर ठिकाणी या मुलांचा शोध घेतला. परंतू त्यास यश आले नाही. दरम्यान सोमवारी सकाळी या खड्डयाच्या काठाशी काहींना कपडे व चपला आढळून आल्या. याबाबतची माहिती मिळताच आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गिते यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. काठावर सापडलेले कपडे बेपत्ता मुलांच्या अंगावरील कपड्याशी मिळतेजुळते असल्याने तत्काळ अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. यानंतर राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेत गाळात अडकलेले तिन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. गाळामुळे शोधकार्यात अडथळा येत होता. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून आडगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.
खेळण्यासाठी घराबाहेर पडलेले हे तिन्ही मित्र पाटानजिक असलेल्या एका बांधकामाच्या साईटवर पोहोचले. तिथे इमारतीसाठी खोदण्यात आलेल्या मोठ्या खड्डयात पावसाचे पाणी साचून तलावाचे स्वरूप आले होते. पाणी बघून तिघांना पाण्यात खेळण्याचा मोह झाला असावा. तिघेही कपडे काढून पाण्यात उतरले. मात्र खड्डयाची खोली, पाणी व गाळ याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. संबंधित बांधकाम साईट विहान ग्रुपची असल्याचे तसेच ‘द व्ही पार्क’ या प्रकल्पाचे काम सुरू होते. खड्डयाच्या भोवती सुरक्षेसाठी पत्रेही लावण्यात आले होते. मात्र तिथे सुरक्षा रक्षक होते का, याबाबत उलगडा होऊ शकला नाही.

























