– पिंजऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी…
नाशिकरोड – विशेष प्रतिनिधी
येथील जय भवानी रोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या वारंवार होत असलेल्या संचारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबतीत कळवल्यानंतर
वन विभागाने नागरिकांसह गस्त घातली. यावेळी बिबट्याच्या पावलांचे ठसे दिसून आले असून पिंजऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, रविवारी सकाळी बिबट्याच्या हालचालींनी परिसरात खळबळ उडाली. सकाळी ७.३० वाजता दीपक लवटे यांचा विक्रम कदम यांना फोन आला. लागलीच त्या ठिकाणी पोहोचून बिबट्याच्या पायाचे ठसा बघून खात्री करून वनविभागाला कळवले. त्यानंतर कमला पार्क, लोणकर मळा, थोरात मळा, जाचक मळा येथील राजू ढेहेनवाल, आकाश मेरोलिया, प्रमोद लोणकर, सागर जाचक यांचे सलग फोन आले. तसा तसा त्याचा माग काढला असता. बिबट्याचे ठसे म्हशीच्या पाण्याच्या हौदाजवळही आढळले. बिबट्याचा वावर वास्तू पार्कमधील एका बिल्डिंगपर्यंत आणि नंतर मिलिट्री एरियापर्यंत गेल्याचे दिसून आले. स्थानिक नागरिकांसह शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख विक्रम राजाभाऊ कदम यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह रात्री दोन वाजेपर्यंत गस्त घालून परिसरात जनजागृती केली.
वनविभागाचे सुमित निर्मल, अनिल अहिराव आणि इतर कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळी परिसराची पाहणी केली. स्थानिकांच्या मागणीनुसार पिंजऱ्यांची संख्या वाढवणे आणि त्यांच्या जागा बदलण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. वन विभागाने पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे. बिबट्याचा मार्ग वास्तू पार्क ते मनोहर गार्डन आणि मळे परिसरातील चव्हाण, सय्यद, पाटोळे, लोणकर, थोरात, सहाणे, जाचक या भागांमधून पुन्हा वस्तू पार्कपर्यंत दिसत आहे. पिंपळगाव खांब आणि सिन्नर परिसरातील यापूर्वीच्या दुर्दैवी घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता आहे. अशी घटना जय भवानी रोड परिसरात घडू नये, यासाठी स्थानिक नागरिक आणि वनविभाग एकजुटीने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. ‘आम्ही सर्वतोपरी काळजी घेत आहोत. नागरिकांनीही सतर्क राहावे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने संपर्क साधावा’, असे आवाहन विक्रम कदम यांनी केले आहे.

या संकटावर मात करण्यासाठी परिसरातील एकजूट आणि वनविभागाचे सहकार्य निश्चितच आशादायी आहे. लौकरच बिबट आणि मनुष्य यांचा होणारा संघर्ष टाळावा यासाठी अभ्यास करून वनविभागाच्या अधिकारी व वेळप्रसंगी वनमंत्री यांना भेटून कोणकोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत अहवाल देणार असल्याने विक्रम कदम यांनी नमूद केले आहे.

























