– पुढच्या वर्षी लवकर या….
नाशिक – विशेष प्रतिनिधी
दहा दिवसांच्या मंगलमय मुक्कामानंतर आज अनंत चतुर्दशीला लाडक्या गणरायाला नाशिककरांतर्फे भावपूर्ण निरोप दिला जात आहे. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी साद घालत सकाळी ११ वाजता रिमझिम पावसात प्रारंभ झालेली शहरातील मुख्य विसर्जन मिरवणूकीतील पहिले मंडळ सायंकाळी पाच वाजेदरम्यान रविवार पेठेत पोहचले होते. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आले असून मिरवणूक पहाण्यासाठी मार्गावर दुतर्फा नाशिककर आबालवृद्धांनी गर्दी केली आहे.
जुन्या नाशिकमधील वाकडी बारव येथून शनिवारी सकाळी ११ वाजता ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. याप्रसंगी आ. देवयानी फरांदे, लक्ष्मण सावजी, सुधाकर बडगुजर, सुनील बागुल, गजानन शेलार, संजय चव्हाण, रामसिंग बावरी, समीर शेटे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, मनपा आयुक्त मनिषा खत्री यांच्यासह विविध राजकीय पक्ष व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. मिरवणुकीत २५ मंडळे सहभागी झाले आहेत. ना. महाजन यांनी स्वतः ढोलवादन करून मिरवणुकीचा आनंद लुटला.
माजी महापौर विनायक पांडे यांच्या शिवसेवा युवक मंडळाने चित्ररथासोबत पथकाने सादर केलेले शिवतांडव नृत्य मिरवणुकीचे आकर्षण ठरले आहे. यंदा मिरवणूक वेळेपूर्वी सुरू झाल्याने पंचवटीतील नागरिकांना पूर्ण मिरवणुकीचा आनंद अनुभवयास मिळणार आहे.


गोदेची पातळी वाढली…नागरिकांची गर्दी
घरगुती गणेश विसर्जन करण्यासाठी नाशिककरांनी गोदा काठावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. सोमेश्वर, आनंदवली, हनुमान घाट, य.म. पटांगण, रामसेतू, गाडगे महाराज पूल, टाळकुटेश्वर मंदिर परिसर, कन्नमवार पूल, तपोवन, दसक पंचक आदी भागात गोदावरी नदीत मुर्ती विसर्जन करण्यासाठी आबालवृद्धांची सकाळपासूनच गर्दी होती. सततच्या पावसामुळे तसेच गंगापूर धरणातून विसर्ग होत असल्यामुळे गोदावरीची पाणी पातळी वाढली आहे. विसर्जन दरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी अग्निशामक दल, महापालिका व शहर पोलीस यांनी विशेष दक्षता घेतली आहे.

























