मुंबई –
मराठी जनांच्या मेळाव्यासाठी शनिवारी वरळी डोम परिसरात उत्सवी वातावरण होतं. मनसे प्रमुख राज ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तब्बल वीस वर्षांनी एकत्र येत असल्याने मेळाव्यात जल्लोष भरला होता. ठाकरे बंधूंनी मेळाव्याला संबोधित करताना ठाकरे शैलीत मार्गदर्शन केल्याने उपस्थितांमध्ये जोष भरला होता. राज ठाकरे यांच्या भाषणात जळगावचे तत्कालीन आमदार सुरेशदादा जैन यांचे मुख्यमंत्रीपद कसे हुकले याचा गौप्यस्फोट केला.
‘कोणताही झेंडा नाही…मराठी हाच अजेंडा’ असे म्हणत शनिवारी झालेला मेळावा मराठीजनांना सुखावणारा ठरला. त्याला प्रमुख कारण ठरले राज व उद्धव यांचे एकत्र येणे. या मेळाव्याचे विशेष आकर्षण तेच होते.
या मेळाव्यात सर्वप्रथम मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे भाषण झाले. मराठीचे बाळकडू आपल्याला घरातूनच मिळाल्याचे सांगताना त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची एक आठवण आवर्जून सांगितली. ‘१९९९ मध्ये तेव्हाचे चार पक्ष स्वतंत्रपणे लढले. निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या. युतीचा मुख्यमंत्री कोण यावर खल सुरू होता. तेव्हा एकेदिवशी दुपारी प्रकाश जावडेकर सहकाऱ्यांसमवेत आले. तेव्हा मी ‘मातोश्री’ मध्येच होतो. जावडेकरांनी बाळासाहेबांना भेटायचे आहे, असे सांगितलं. परंतू ते झोपले आहेत. काही निरोप असेल तर सांगा मी पोहचवतो, असे राज म्हणाले. परंतू जावडेकर साहेबांना भेटायचे आहे. मुख्यमंत्री म्हणून सुरेशदादा जैन यांच्या नावाचा प्रस्ताव असल्याचे सांगितलं.’ राज ठाकरे यांनी जाऊन बाळासाहेबांना झोपेतून जागे केले व जावडेकर आल्याचे सांगितलं. मुख्यमंत्री पदासाठी सुरेश जैन यांच्या नावाचा प्रस्ताव आणल्याचेही सांगण्यात आले. तेव्हा ताडकन बाळासाहेब म्हणाले, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल.
मराठीचा आग्रह धरताना आपल्याकडून चूक होऊ देऊ नका. पण समोरचा चुकला तर कानाखाली वाजवा. मात्र त्याचा व्हिडिओ काढू नका, असा मिश्कील सल्ला राज ठाकरे यांनी दिल्यानंतर उपस्थितांनी जोरदार दाद दिली.
उठेगा नही साला…
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मराठी जनांच्या मेळाव्यात भाषण करता आक्रमकपणे विचार मांडले. पुण्यातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढलेल्या ‘जय गुजरात’ या घोषणेची त्यांनी खिल्ली उडवली. ‘किती लाचारी करायची. ‘पुष्पा’ चित्रपटातील नायक दाढीवरून हात फिरवत ‘झुकेगा नही साला’ म्हणतो. पण हा दाढीवाला ‘उठेगा नही साला’. कसा उठणार…आहे काय तुझ्याकडे उठण्यासारखं’ असे म्हणतात उपस्थितांनी जोरदार दाद दिली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी ‘मी विचार…म्हणतोय’ अशी मिश्किली केली. हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल, अशी टीका त्यांनी ना. एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

























