नाशिकरोड – विशेष प्रतिनिधी
परिसरातील प्रभाग क्रमांक २० मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. यामुळे आबालवृद्ध हवालदील झाले आहेत. जर दोन दिवसांच्या आत या समस्येचे निराकरण झाले नाही, तर नाशिक शहर काँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
‘एनएसयुआय’ चे अध्यक्ष अल्तमश शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १५ दिवसांपासून नाशिक रोडमधील, प्रभाग क्र. २० मध्ये गंभीर पाणीटंचाईची परीस्थिती आहे. या प्रभागात पुरवठा केला जाणारा पाण्याचा ओघ पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे अंथरुणावरचे वृद्ध, अर्भकं, रोगी आणि सामान्य नागरिक पाणी मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत. तसेच यामुळे शौचालय, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याच्या अभावी आरोग्याची चिंता वाढत आहे. नाशिक शहराला “स्मार्ट सिटी” म्हणून घोषित करण्याचा दावा सरकारकडून केला जातो, पण “स्मार्ट” शहरात मूलभूत पाणीपुरवठा बंद का, असा शेख यांनी उपस्थित केला.

























