पुणे – विशेष प्रतिनिधी
कविता, जगणं आणि पाऊस अशा तिन्ही गोष्टी एकमेकांना समांतर जाणाऱ्या आहेत. त्यांचं अपूर्व अद्वैत कविता लेखनात साधता येणे, कवितेत उतरता येणे किंवा जगून दाखवता येणे ही एक मौलिक प्रक्रिया आहे; असे मत प्रसिद्ध अभिनेते, नाटककार मकरंद देशपांडे यांनी व्यक्त केले. स्वानंद बेदरकर यांच्या ‘पावसाच्या गर्भतळी’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ समीक्षक रणधीर शिंदे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी उपस्थित होते.
पाऊस येतो तेव्हा सारे काही धुऊन टाकतो. थोडक्यात सृष्टी स्वच्छ करण्याचे आणि त्या स्वच्छतेनंतर नवनिर्मिती साधण्याचे काम पाऊस करतो. बेदरकर यांच्या कवितांमध्ये एका बाजूला माणसाच्या जगण्यातली सृजनात्मकता, दुसऱ्या बाजूला कविता हे सृजन आणि तिसऱ्या बाजूला पावसाने साधलेली सर्जकता याचा संगम दिसतो. अद्वैताचे प्रचंड भान असणारी ही कविता आपल्याला अंतर्मुख करते असे सांगून देशपांडे यांनी रसिकांना संग्रहातील एक कविता ऐकवली.
ज्येष्ठ समीक्षक रणधीर शिंदे यांनी सांगितले, पाऊस हा फक्त बाहेर पडत नसतो, तर तो व्यक्तीच्या अंतरंगातही पडतो. अंतरंगातला पाऊस बेदरकर यांनी आपल्या कवितेत रेखाटला असून मराठी कवितेची धारा पुढे नेण्याचे सामर्थ्य या कवितेत आहे. प्रयोगशीलता आणि तरीही एकाच विषयावरील संपूर्ण संग्रह अशी कसरत अनेकदा कवितेवर नकारात्मक परिणाम करणारी असते; मात्र तसे कुठेही या संग्रहात झालेले दिसत नाही.
अध्यक्षीय मनोगतात जोशी म्हणाले, मानवी जीवनाचा सत्तर टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. पंचमहाभूतांतील एक तत्त्व म्हणून आपण जलतत्त्वाचा विचार प्राचीन काळापासून करीत आलो आहोत. तेच जलतत्त्व पावसाच्या रूपाने ‘पावसाच्या गर्भतळी’ या स्वानंद बेदरकर यांच्या संग्रहात येते. दुःख, सुख, सर्जन, स्त्री, निसर्ग, लोकतत्त्व, मिथके अशा वेगवेगळ्या प्रतीक, प्रतिमांचा वापर करून या कविता वाचकाला सामोऱ्या येतात. त्यामुळेच त्या आनंद देणाऱ्या आहेत.
कवितेची प्रक्रिया आणि पुस्तकापर्यंतचा प्रवास स्वानंद बेदरकर यांनी उपस्थितांपुढे मांडत संग्रहातील दोन कवितांचे वाचनह केले. पियू शिरवाडकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे, ज्येष्ठ अनुवादक उमा कुलकर्णी, ज्येष्ठ समीक्षक वंदना बोकिल यांच्यासह पुण्यातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते.

























