नाशिक – विशेष प्रतिनिधी
स्व. सुरेखाताई भोसले सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने सचिन भोसले आणि सौ. रश्मी सचिन भोसले यांनी 10 आणि 12 वीत घवघवीत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर, अजय बोरस्ते, प्रविण तिदमे, डॉ. सुषमा दुगड, हिरामण नाना वाघ, रोशन शिंदे, रमेशकाका भोसले, आनंद फरताळे, पोपटराव नागपुरे, अश्विनी धोपावकर, सचिन भोसले, रश्मी भोसले आदींसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आर्थिक गुंतवणूक सल्लागार अविनाश वाळुंजे यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना आर्थिक नियोजन कसे करावे, बचत कशी करावी आणि आर्थिक शिस्त कशी अंगीकारावी याचे विस्तृतपणे मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी अगदी छोट्या छोट्या सवयीने आपण कशाप्रकारे बचत करू शकतो, बचतीचे महत्व कसे आहे, पालक आपल्या मुलांसाठी कशाप्रकारे कष्ट करून त्यांच्या शिक्षणाची सोय करतात, आर्थिक साक्षरता का जरुरी आहे याविषयी उपस्थितांना सांगितले.
आपल्या मनोगतात आर्थिक गुंतवणूक सल्लागार अविनाश वाळुंजे यांनी अनेक उदाहरणे देत बचतीचे महत्व पटवून दिले. तसेच वयात येणाऱ्या मुलांनी खोट्या प्रलोभनापासून दूर राहणे आणि खोटा दिखावा टाळण्याचे आवाहन केले. गरजेचे आहे तेथेच योग्य खर्च करावा, अतिरिक्त खर्च म्हणजे तुमच्याच बचतीची तूट जी कधीच भरून काढणे शक्य नसल्याचे वाळुंजे यांनी सांगितले. यावेळी सचिन भोसले आणि रश्मी भोसले या दाम्पत्यांचे सामाजिक कार्याचा गौरव वाळुंजे यांनी केला. आपल्या संभाषणाच्या शेवटी आर्थिक गुंतवणूक सल्लागार अविनाश वाळुंजे यांनी उपस्थितांना बचतीची शपथ दिली आणि देशासाठी एक उत्तम नागरिक होण्याचे आवाहन केले.

























