नाशिक – विशेष प्रतिनिधी
ओरीसा राज्यातून दोन कारमधून गांजा आणणाऱ्या टोळीला समृद्धी महामार्गावर जेरबंद करण्यात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी नेवासा (जि. अहिल्यानगर) येथील तिघांना अटक करण्यात आली असून १२१ किलो ४२९ ग्रॅम गांजा व दोन कार हस्तगत करण्यात आली आहे. यातील चौथा संशयित सुनिल अनार्थे हा फरार झाला असून तो बहुचर्चित टिप्पर गँगचा सराईत गुन्हेगार आहे.
पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सिन्नर तालुक्यातील शिवडे येथील समृद्धी महामार्गावर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, ग्रामीण जिल्हयातील राज्य व राष्ट्रीय महामार्गावरून अंमली पदार्थ गांजाची होणारी अवैध तस्करी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते. त्यानुसार ‘एलसीबी’ चे पथक महामार्गावर लक्ष ठेवून होते. त्यातच पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांना मिळालेल्या माहितीनुसार, समृध्दी महामार्गावर शिवडे (ता. सिन्नर) परिसरात सास्थानिक गुन्हे शाखेचे ०४ पथके तयार करून गस्तीवर नेमण्यात आले होते. दरम्यान नागपूर बाजुकडून मुंबईच्या दिशेने एक सफेद रंगाची स्विफ्ट व एक चॉकलेटी रंगाची होण्डा अमेझ कार भरधाव वेगाने येतांना दिसली. या वाहनांचा पोलीस पथकाने शिताफिने पाठलाग केला असता, त्यापैकी स्विफ्ट कार यु-टर्न मारून नागपुर दिशेने भरधाव वेगात गेली तर अमेझ कार ही मुंबईच्या दिशेने पळुन गेली. दोन्ही वाहनांचा पोलीस पथकाने पाठलाग करून स्विफ्ट कार ही कोकमठाण टोलनाका परिसरात अडविली. तसेच अमेझ कार मधील चालकाने शिवडे गावचे शिवारात वाहन सोडून तेथून पलायन केले. दोन्ही ठिकाणांवरून ताब्यात घेतलेले इसम व वाहनांची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून २४ लाख २८ हजार ५८० रुपयांचा १२१ किलो ४२९ ग्रॅम वजनाचा गांजा, वाहतूक करण्यासाठी वापलेली एक सफेद रंगाची मारूती स्विफ्ट कार, एक चॉकलेटी रंगाची होण्डा अमेझ कार, ०३ मोबाईल फोन, १५,००० रूपये रोख असा एकुण ३६,२९,५८०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यातील अटक आरोपींची नावे भारत नारायण चव्हाण, (वय ३५, रा. आण्णाभाऊ साठे नगर) तुषार रमेश काळे (वय २७, रा. ज्ञानेश्वर रोड), संदिप कचरू भालेराव (वय ३२, रा. गंगानगर) अशी असून ते अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील आहेत. तर चौथा संशयित सुनिल भास्कर अनार्थे (रा. शिर्डी, ता. राहता, जि. अहिल्यानगर) हा फरार झाला आहे. विनापरवाना बेकायदेशीररित्या मानवी मनावर विपरीत परिणाम करणारा गांजा नावाचा अंमली पदार्थ आपले कब्जात करण्यासाठी बाळगून त्याची अवैधरित्या वाहतुक करतांना मिळुन आले म्हणुन त्यांचेविरूध्द सिन्नर पोलीस ठाण्यात एन.डी.पी. एस. कायदा कलम ८ (क), २० (ब), (Ⅱ), (क), २२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना या गुन्हयात अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, सहायक निरीक्षक जीवन बोरसे, उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, सहायक उपनिरीक्षक नवनाथ सानप, पोलीस अंमलदार सचिन धारणकर, विनोद टिळे, सचिन गवळी, माधव साळे, श्रीकांत गारूंगे, सुधाकर बागुल, नवनाथ वाघमोडे, किशोर खराटे, शरद धात्रक, धनंजय शिलावटे, विश्वनाथ धारबळे, प्रितम लोखंडे, नवनाथ शिरोळे, आबा पिसाळ, योगिता काकड, रविंद्र गवळी यांनी ही कामगिरी केली आहे.
—————————————————-
सराईत गुन्हेगारांचा समावेश
या गुन्हयातील फरार आरोपी सुनिल भास्कर अनार्थ हा नाशिक शहरातील कुख्यात टिप्पर गँगचा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापुर्वी नाशिक शहरातील अंबड, सातपूर, सरकारवाडा पोलीस ठाण्यांमध्ये मोक्का, घरफोडी, चोरी, आर्म अॅक्ट, खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर स्वरूपाचे एकुण ११ गुन्हे दाखल आहेत. तो सध्या श्रीरामपुर व शिर्डी परिसरात वास्तव्यास आहे. तसेच त्याचा साथीदार संदिप कचरू भालेराव याचेवर देखील पुणे, बुलढाणा, अहिल्यानगर जिल्हयात दरोडा व चोरी याप्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपी हे ओडीसा राज्यातून चारचाकी वाहनांमधुन गांजाची तस्करी करत होते, तसेच महाराष्ट्र राज्यात गांजाची विकी कोठे करणार होते याबाबत पोलीस पथक तपास करीत आहे.

























