मुंबई –
तमाम मराठी जनांचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले वैभव असणाऱ्या १२ किल्ले यांचा समावेश आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून त्याचा आता समावेश करण्यात आला आहे. ही बाब संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची ठरणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’ वर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्लेवैभव असलेले महाराष्ट्रातील ११ किल्ले त्यात रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे. शिवभक्तांसाठी आजचा आनंदाचा क्षण असल्याचे ते म्हणाले.
स्वराज्यनिर्मिती आणि ते टिकविण्यासाठी महाराजांनी हे किल्लेवैभव उभारले. शत्रूला न दिसणारे दरवाजे आणि किल्ल्यांचे माची स्थापत्य हे मराठा स्थापत्यशास्त्रातील महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. हे माची स्थापत्य जगातील कोणत्याही किल्ल्यात दिसून येत नाही. माची स्थापत्य म्हणजे गडाच्या सुरक्षिततेचा आणि युद्धकौशल्याचा मुत्सद्दीनीतीने रचलेला भाग आहे. हेच ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले आहे.

हा टप्पा गाठण्यासाठी अनेकांचे हातभार लाभल्याचे सांगताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार मानले. त्यांनी दिलेला पाठिंबा आणि केंद्र सरकारकडून सक्रिय सहभाग ही अत्यंत मोलाची बाब ठरली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि संस्कृती मंत्रालयाने यात मोठी मदत केल्याचे ना. फडणवीस म्हणतात.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही वेळोवेळी साथ दिली. माझे सहकारी मंत्री आशिष शेलार यांनी स्वत: जाऊन युनेस्कोच्या महानिदेशकांची भेट घेतली. तेथे तांत्रिक सादरीकरण केले. माझ्या कार्यालयातील अपर मुख्य सचिव विकास खारगे तसेच भारताचे युनेस्कोतील राजदूत विशाल शर्मा आणि पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे हेमंत दळवी त्यात सहभागी होते. अनेकांचे हातभार लागले आणि त्यातून देशभरातील शिवभक्तांसाठी आजचा आनंदाचा क्षण साकारला गेला आहे, असे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले आहे.

























