– भारत-पाक सामन्यावरुन टीका…
मुंबई – विशेष प्रतिनिधी
पहलगाम येथे निरपराध पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील शहीद परिवारांचे दुःख अद्यापही ताजे असताना आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत-पाक यांच्यात झालेल्या सामन्यामुळे आयसीसी व केंद्रातील सत्तारूढ भाजपावर विरोधकांनी लक्ष केले आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी खास शैलीत व्यंगचित्र रेखाटत गृहमंत्री अमित शाह व त्यांचे पूत्र आणि आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांच्यावर टीकेचे कुंचल्याद्वारे फटकारे ओढले आहे.
‘नक्की कोण जिंकलं ? आणि नक्की कोण हरलं?’ असे प्रश्न उपस्थित करताना मनसेप्रमुखांनी आयसीसी प्रमुख जय शहा हे पहलगाम हल्ल्यातील मृत पर्यटकांना ‘अरे बाबांनो उठा, आपण जिंकलो, पाकिस्तान हरले !’ असे सांगत असल्याचे खोचकपणे मांडले असून दुसरीकडे गृहमंत्री हाताची घडी घालून उभे असल्याचे दाखवले आहे.
पहलगाम हल्ल्याचे दुःख अद्यापही ताजे असताना पाकिस्तान बरोबर क्रिकेटचा सामना खेळण्यावरून विरोधकांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. शिवसेना ठाकरे गटाने मुंबईसह राज्यात ‘सिंदूर’ आंदोलन करत पंतप्रधानांना सिंदूर पाठवण्याची घोषणा केली होती. तर आता मनसेप्रमुखांनी व्यंगचित्राद्वारे कुंचल्याचे फटकारे मारताना भारत-पाक यांच्यातील क्रिकेट सामन्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

























