– बुलढाण्याला जाताना झाली अटक…
पुणे – विशेष प्रतिनिधी
पुण्यातील बहुचर्चित गोविंद उर्फ आयुष गणेश कोमकर या १९ वर्षीय युवकाच्या हत्याकांडातील प्रमुख संशयित सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर (वय ७०) याच्या अटकेचा मार्ग पोलिसांना नाशिकमध्ये सापडल्याचे समोर आले आहे. केरळमधून विमानाने मुंबईला उतरल्यानंतर बंडू आंदेकरसह चौघेजण नाशिकमध्ये मुक्कामी होते. सप्तश्रृंग गडावर देवीचे दर्शन घेतल्यानंतर खासगी प्रवासी बसने बुलढाण्याकडे जात असताना पुणे पोलिसांना पक्की खबर मिळाली व अखेर मेहकर येथे समृद्धी महामार्गावर बस अडवून चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील आंदेकर विरुद्ध सोमनाथ गायकवाड व कोमकर यांच्यातील टोळी युद्धात आजवर तीन बळी गेले आहे. विशेष म्हणजे गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला बळी गेलेला आयुष हा बंडू आंदेकरचा सख्खा नातू होता. त्यामुळे या टोळी युद्धाला कुटुंब कलहाचीही किनार आहे.
पुणे पोलिसांनी बंडू आंदेकर, मुलगी वृंदावनी वाडेकर तसेच नातू स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर यांना मेहकर नजिक ताब्यात घेतले. या चौघांसह स्वराज व तुषार वाडेकर यांच्या पत्नी असे सहाजण २९ ते ५ सप्टेंबर दरम्यान केरळला विमानाने देवदर्शनासाठी गेले होते. तेथे पद्मनाभस्वामी मंदिरासह इतर मंदिरांना भेटी दिल्या. पाच सप्टेंबरला रात्री आयुष कोमकरची हत्या झाली.
सहा सप्टेंबरला सायंकाळी विमानाने मुंबईला परतल्यानंतर तेथून खासगी बसने टोळी प्रमुखासह चौघेजण नाशिकला आले. नाशिकला मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी सप्तश्रृंग गडावर पोहचले. तिथे मुक्काम केल्यानंतर आठ सप्टेंबरला देवीचे दर्शन करून खासगी बसने बुलढाण्याकडे निघाले. मुंबई-नाशिक-सप्तश्रृंग गड या प्रवासाची माहिती पुणे गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर एक पथक नाशिकला आले. आंदेकर व सहकारी ज्या खासगी बसने प्रवास करत आहेत. त्याची पक्की माहिती मिळाल्यानंतर समृद्धी महामार्गाने पोलिसांनी बसचा माग काढला व बुलढाण्यानजिक खासगी बस रोखून चौघांना ताब्यात घेतले.
————————————————————टोळी युद्धाचे तीन बळी; निखिल…वनराज व आयुष !
बंडू आंदेकर व सोमनाथ गायकवाड यांच्या दोन टोळ्यांमधील वादात आजवर तीन बळी गेले आहेत. सोमनाथ हा आंदेकर टोळीचाच सदस्य होता. एका प्रकरणात त्याला जन्मठेपही लागली होती. तर आंदेकर मात्र निर्दोष मुक्त झाले होते. त्यानंतर काही कारणाने आंदेकर व गायकवाड यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. तर दुसरीकडे आंदेकर यांच्या कन्या संजिवनी व कल्याणी कोमकर यांच्यातही मालमत्तेच्या वादातून दुरावा आला. दोघींचे पती जयंत व गणेश कोमकर यांची सोमनाथ गायकवाड बरोबर सलगी वाढली.
सन २००३ मध्ये सोमनाथ गायकवाड याचा आतेभाऊ निखिल आखाडे व अनिकेत दुधभाते यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. त्यात आखाडेचा बळी गेला. त्याचा बदला म्हणून एक सप्टेंबर २०२४ ला राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक व बंडू आंदेकर यांचा मुलगा वनराज आंदेकर याचा गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून खून करण्यात आला. त्यानंतर बरोबर एक वर्षाने बदला घ्यायचा म्हणून आंदेकर टोळीने तुरुंगात असलेल्या सोमनाथ गायकवाड याच्या कुटुंबाची रेकी केली जात होती. ‘मुलाच्या बदल्यात मुलगा’, हे सूत्र त्यामागे होते. परंतू पुणे पोलिसांनी हा डाव उधळला. मात्र चार दिवसांनी म्हणजे पाच सप्टेंबर २०२५ रोजी गोविंद उर्फ आयुष गणेश कोमकर या युवकाची हत्या करण्यात आली. बंडू आंदेकर याचा आयुष हा नातू. मात्र त्याच्या हत्या प्रकरणात आता आजोबाला आरोपी करण्यात आले आहे.

























