नाशिक – विशेष प्रतिनिधी
पोलीस पाटील हे प्रशासकिय कामात महत्वाचा आधारस्तंभ ठरतात. गावपातळीवरील माहिती संकलन, आपत्ती व्यवस्थापन व कायद्याच्या अंमलबजावणीसाठी त्यांचे योगदान अमूल्य आहे.
केंद्र शासनाच्या नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत ‘अंमली पदार्थ मुक्त गाव’ ही संकल्पना राबवून, अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत व धोक्यांविरूध्द लढण्यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस पाटील यांना केले.
नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे जिल्हयातील पोलीस पाटीलांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कालिदास कलामंदिरात आयोजित कार्यशाळेत पोलीस पाटील यांच्या महत्वपूर्ण योगदानाचा उहापोह करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपस्थित होते.
पोलीस पाटील हे प्रशासकिय कामात महत्वाचा आधारस्तंभ ठरतात. गावपातळीवरील माहिती संकलन, आपत्ती व्यवस्थापन व कायद्याच्या अंमलबजावणीसाठी त्यांचे योगदान अमूल्य आहे. या कार्यशाळेत नवीन फौजदारी कायदेविषयक ज्ञान, पोलीस पाटलांचे कर्तव्य, अधिकार व मर्यादा, पोलीस पाटलांचा पूर्व इतिहास, पंचायत राज संस्थेचा महत्वाचा घटक, पोलीस पाटलांचे योगदान, पोलीस पाटील व पोलीस यांमधला दुवा, पोलीस पाटलांच्या कर्तव्याचा समाजावर होणारा चांगला परिणाम, कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीसांना होणारी मदत, पोलीस पाटलांनी ठेवावयाचे रजिष्टर, रजिष्टरमध्ये करावयाच्या महत्वाच्या नोंदी, गुन्हेगारी नियंत्रण, अवैध व्यवसाय समुळ उच्चाटन, तंटामुक्त गाव, सण-उत्सवादरम्यान राखावयाची शांतता व सुव्यवस्था, शांतता समिती सदस्य अशा अनेक मुद्यांवर पोलीस पाटलांच्या भुमिकेचे महत्व विषद करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथींनी उपस्थित पोलीस पाटलांना त्यांचे कर्तव्य व अधिकार याबाबत मार्गदर्शन केले. तसेच केंद्र शासनाच्या नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत अंमली पदार्थ मुक्त गाव ही संकल्पना राबवून, अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत व धोक्यांविरूध्द लढण्यासाठी जनजागृती निर्माण करावी यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथींच्या हस्ते पोलीस पाटील मार्गदर्शिका प्रसारित करण्यात आली. यावेळी उपस्थित पोलीस पाटलांना मार्गदर्शिकेचे वाटप करण्यात आले. सदर मार्गदर्शिकेत नमूद केलेले पोलीस पाटलांचे कर्तव्य व अधिकार याप्रमाणे अंमलबजावणी करण्यासाठी उपस्थितांना यावेळी पोलीस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच जिल्हयातील बेरोजगार तरूणांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी उपस्थित असलेल्या विविध संस्थांचे प्रतिनिधी यांचेमार्फतीने उपस्थित पोलीस पाटलांना मार्गदर्शन करण्यात आले व खेडोपाडयांतील शिक्षित तरूणांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
प्रशासनाच्या मदतीसाठी कर्तव्य बजावणा-या पोलीस पाटलांचे यावेळी प्रमुख अतिथीतर्फे आभार व्यक्त करण्यात आले. पोलीस पाटलांच्या कार्यामुळे प्रशासनाचे काम सुकर होत असून, भविष्यातही त्यांच्याकडून अशाच प्रकारे सहकार्य अपेक्षित असल्याचे यावेळी नमुद करण्यात आले. यावेळी सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांनी केले. याप्रसंगी पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) नितीनकुमार गोकावे, पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा) रविंद्र मगर, पोलीस निरीक्षक (मानव संसाधन विभाग) राहुल मोरे, हवालदार ज्ञानेश्वर शेलार, यांचेसह नाशिक विभागातील पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, ७५० पोलीस पाटील उपस्थित होते.

























