नवी दिल्ली –
समाजजागृती, युवतींचा आत्मविकास आणि महिलांना धार्मिक क्षेत्रात सन्माननीय स्थान देण्याच्या दिशेने कार्यरत असलेल्या रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या प्रेरणादायी उपक्रमाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांच्या शुभहस्ते, नवी दिल्लीत समितीच्या महिला कार्यकर्त्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना विजयाताईंनी अत्यंत महत्त्वाचे विधान केले की, ही देशातील पहिली अशी आरती आहे, जिने महिलांना मानाचे स्थान दिले. हा उपक्रम धार्मिक कार्यक्रमांमध्ये महिलांना सन्मानाने सहभागी करून घेण्याचा नवा आदर्श निर्माण करणारा आहे. यामुळे संपूर्ण देशात नवीन विचारधारा आकार घेईल, आणि महिलांना धार्मिक नेतृत्वातही अधिकार प्राप्त होतील, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
समितीच्या विश्वस्त सौ. कविता देवी यांनी हा सन्मान स्वीकृत केला. यावेळी समितीच्या इतर मान्यवर महिला कार्यकर्त्यांमधून महिला विश्वस्त डॉ. अंजली वेखंडे, कोषाध्यक्षा सौ. अशिमा केला, सौ. शोभा फड, सौ. विणा गायधनी, स्वाती संचेती, प्रेरणा बेळे, सौ. बोंदार्डे, किर्ती खोचे, सौ. सहाना माताजी तसेच आरती उपक्रमाच्या पहिल्या बॅचपासून सहभाग नोंदवणाऱ्या धनश्री पाटे, वेदिका अंभोरे, कु.सायली पाठक, हर्षदा बोडके कु. इशिता, गिताश्री इदी युवतींचा देखील विशेष उल्लेख करून गौरव करण्यात आला.
समितीचे अध्यक्ष जयंतराव गायधनी, सर्व विश्वस्त व कार्यकर्त्यांनी संपूर्ण महिला पथकाचे मनःपूर्वक अभिनंदन केले. समाजाच्या विविध स्तरांतून या गौरवाबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे. या गौरवप्रसंगी शैलेश देवी व मुकुंद खोचे यांनी राष्ट्रीय महिला आयोगाचे विशेष आभार मानत, हा सन्मान ही केवळ समितीसाठीच नव्हे तर धार्मिक क्षेत्रात महिलांना दिला जाणारा सन्मान म्हणून संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे, असे मत व्यक्त केले.
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने गेल्या काही वर्षांमध्ये युवतींच्या जीवनाला आकार देणारे, संस्कारमूल्य वाढवणारे आणि सामाजिक भान जागवणारे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. महिला आरती उपक्रम त्यामधील एक क्रांतिकारी पाऊल ठरले असून या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आल्याने समितीच्या सेवाभावी कार्याला नवचैतन्य मिळाले आहे.

























