– पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध…
नाशिक – विशेष प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधी नाशिकला पालकमंत्री न देणे, ही घोर बेपर्वाई आहे. मुख्यमंत्री स्वतःच या सिंहस्थाचा वापर करून राजकीय वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाने उपस्थित केला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सर्व समित्यांमध्ये साधुसंत व समाजप्रतिनिधींना सन्मानाने स्थान देण्यात यावे. तसेच कुंभमेळ्याचा निधी कुठे जातो याचा सार्वजनिक लेखाजोखा जाहीर करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. याप्रसंगी खा. राजाभाऊ वाजे, उपनेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, जिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गिते, मसूद जिलानी, बाळासाहेब कोकणे, दिलीप मोरे, सुभाष गायधनी, अस्लम मनियार, गोरख वाघ, सुनील जाधव, देवा जाधव, राहूल दराडे, सागर कोकणे, संपतराव जाधव, प्रशांत शेवाळे, सुनील मौले, रितेश साळवे, राकेश साळुंके आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा, त्र्यंबकेश्वर परिसरात वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर झालेला हल्ला हा प्रकार अतिशय गंभीर व दुर्दैवी आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या धार्मिक सोहळ्याच्या आधी अशी घटना घडणे, हे संपूर्ण प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे करते.
आजतागायत नाशिक जिल्ह्यासाठी पालकमंत्री नेमले गेलेले नाहीत. एवढ्या महत्त्वाच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधी नाशिकला पालकमंत्री न देणे, ही प्रशासनाची घोर बेपर्वाई आहे का, की मुख्यमंत्री स्वतःच या सिंहस्थाचा वापर करून राजकीय वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत? असा प्रश्न जनतेसमोर निर्माण होतो.

मुख्यमंत्री यांनी उत्साहाने नाशिक शहराला “दत्तक” घेतले होते, पण शहरातील रस्ते, पाणी, आरोग्य, रोजगार याकडे दुर्लक्ष का करत आहेत? “सिंहस्थ कुंभमेळा हा सोहळा खरोखर भाविकांच्या सुविधा व व्यवस्थेसाठी आहे की फक्त एका नेत्याच्या राजकीय प्रतिमेसाठी?. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुंभमेळ्याला त्यांच्या राजकीय ताकदीचे प्रदर्शन बनवले होते. त्याच पद्धतीने नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा फडणवीस यांच्यासाठी राजकीय स्पर्धेचा विषय तर बनवला जात नाही ना? असा संशय निर्माण होतो. पत्रकारांवरील हल्ला, साधुसंतांना दुय्यम वागणूक, पालकमंत्रीची अनुपस्थिती, आणि प्रशासनातील पारदर्शकतेचा अभाव या सर्व गोष्टी एकत्रितपणे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीवरच काळा डाग ठरतात.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष जिल्हाधिकारी महोदयांकडे मागणी करतो की, पत्रकारांवरील हल्ल्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सर्व समित्यांमध्ये साधुसंत व समाजप्रतिनिधींना सन्मानाने स्थान देण्यात यावे. नाशिक जिल्ह्यासाठी तात्काळ पालकमंत्री नेमण्यात यावा. कुंभमेळ्याचा निधी कुठे जातो याचा सार्वजनिक लेखाजोखा जाहीर करण्यात यावा.

























