– नात्यांचे सर्व्हिसिंग या कथासंग्रहाच्या निर्मिती प्रक्रियेविषयी उलघडला प्रवास…
नाशिक – विशेष प्रतिनिधी
“जीवनाच्या प्रवासात अनेक माणसे भेटली. त्यांच्या मोठेपणाने, दिलेल्या प्रेरणेने माझ्या वाटचालीला नवे दिशा मिळाल्या. त्याच अनुभवांचा प्रामाणिक लेखाजोखा म्हणजेच ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ हा माझा कथासंग्रह. जीवन जगण्याची कला ही सकारात्मकतेतून आनंद देणारी असते, आणि त्याच सकारात्मकतेची मी कथांमध्ये गुंफण केली आहे”, असे प्रतिपादन
विश्वास को ऑप बँकेचे संस्थापक अध्यक्ष मा. विश्वास लीलावती जयदेव ठाकूर यांनी केले.
‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ हा विश्वास को ऑप बँकेचे संस्थापक अध्यक्ष मा. विश्वास लीलावती जयदेव ठाकूर यांचा बहुचर्चित तसेच वाचकांच्या उदंड प्रतिसादाने गौरवलेला कथासंग्रह आहे. या पुस्तकाविषयी रसिकांशी संवाद साधण्यासाठी नाशिक येथील ऋतम परिवार तर्फे ‘कथा वैखरी’ या उपक्रमांतर्गत विशेष मुक्त संवादाचे आयोजन करण्यात आले होते. या संवादात ठाकूर सरांनी नात्यांचे सर्व्हिसिंग या कथासंग्रहाच्या निर्मिती प्रक्रियेविषयी अत्यंत मनमोकळेपणाने विचार मांडले.

चित्रपटाचा फ्लॅशबॅक, असा भाबडेपणा नकोच, नेमका दोष कोणाचा?, आयुष्यभर पुरणारी सल अशा उल्लेखनीय कथांच्या निर्मितीमागील अनुभव, त्या प्रवासात भेटलेली माणसे आणि त्यांच्या जिव्हाळ्याच्या आठवणी श्री. ठाकूर यांनी रसिकांसमोर सजीवपणे मांडल्या. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अभिनेते प्रशांत साठे व सौ. जया साठे यांनी केले. तर नियोजनाची जबाबदारी नंदकुमार देशपांडे, गजानन ढवळे व श्रद्धा देशपांडे यांनी समर्थपणे पार पाडली. साहित्य, कला आणि रसिकांच्या सृजनशीलतेला प्रेरणा व व्यासपीठ देणारा हा ‘कथा वैखरी’ उपक्रम नाशिकच्या सांस्कृतिक वैभवाला नवी ऊर्जा देणारा ठरत आहे.

























