पंचवटी : विशेष प्रतिनिधी
मखमलाबादला शेकडो वर्षांची परंपरा असलेली व मखमलाबाद तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे आराध्य दैवत असलेल्या आणि नवसाला पावणाऱ्या नागोबा देवतेची यात्रा श्रावण शुद्ध ५ नागपंचमीला मंगळवार (दि.२९) रोजी गावाजवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या निसर्गरम्य अमृत उद्यानाच्या तवली डोंगराच्या हिरवळीवर भरणार आहे. यात्रेनिमित्त गावातील सासुरवाशीण आणि माहेरवाशीण महिला आपल्या नवसाची पूर्ती करण्यासाठी हजेरी लावतात. यात्रेनिमित्त दोन तीन दिवस आधीच व्यावसायिकांची वर्दळ सुरू झाली आहे.
यात्रेनिमित्त ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष भास्करराव पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली श्रीराम मंदिराच्या सभागृहात बैठक होऊन त्यात यात्रेचे नियोजन करण्यात आले. महानगरपालिकेकडून तवली डोंगराचा विकास पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. यात्रेचा सर्व खर्च ग्रामविकास मंडळ गावातील मूळ ग्रामस्थांकडून सालाबादाप्रमाणे वर्गणी जमा करून भागवत असतात. गावातील ग्रामस्थांकडून प्रहराप्रमाणे वर्गणी जमा केली जाते. पूर्वी कमी वर्गणी घेतली जात असे पण जसजसा परिसर आणि यात्रोत्सव सप्ताह आदींचा खर्च वाढत असल्याने यावर्षी वर्गणी वाढवून ती २०० रुपये करण्यात आली आहे. ही वर्गणी ग्रामविकास मंडळातील प्रहराप्रमाणे नेमण्यात आलेल्या सदस्यांच्या मार्फत जमा करण्यात येते.
पूर्वी तवलीच्या टेकडीवर एक नागोबाचा चिरा होता, परंतु आज या ठिकाणी एक नागोबा नागदेवी चिऱ्याचे भव्य मंदिर थाटामाटात उभे राहिले आहे. त्याच्याच लगत मनसा माता मंदिराचीही उभारणी केली गेली आहे. मनसा माता देवी मंदिराच्या शेजारी नुकतेच या ठिकाणी नागेश्वर महादेव मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. सुमारे ११ हजार विविध जातींची झाडे या ठिकाणी लावण्यात आली आहेत. त्यामुळे हे ठिकाण एक निसर्गरम्य झाले आहे. त्यापूर्वी नागोबाच्या मंदिराकडे कोणीही फिरकत पण नसे. परंतु आता या ठिकाणी अमृत उद्यानाची निर्मिती केल्याने रोज नागरिकांची वर्दळ वाढली आहे.

यात्रेमुळे नाशिक शहर आणि परिसरातील लाखो भाविक या ठिकाणी हजेरी लावतात. यावेळीसुद्धा भाविकांसह पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. पूर्वी मर्यादित असलेली लोकसंख्या आज ४० ते ५० हजारांवर पोहचली आहे. त्यामुळे यात्रेच्या दिवशी लाखो रुपयांची मोठी आर्थिक उलाढाल होत असते. यात्रेसाठी मखमलाबाद सह पंचक्रोशीतील म्हसरूळ, आडगाव, मातोरी, मुंगसरा, दरी, गिरणारे आदी भागातील नागरिक आवर्जून हजेरी लावतात.
यात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष भास्करराव पिंगळे उपाध्यक्ष गंगाधर खोडे सरचिटणीस मिलिंद मानकर, सदस्य मदनशेठ पिंगळे, आबासाहेब मुरकुटे, मोतीराम पिंगळे, रमेश माळी, बाबुराव रायकर, विष्णू काकड, देवराम पवार, वास्तुुविशारद पंडित काकड आदींनी केले आहे.यावेळी म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश बोरसे, पोलिस उपनिरीक्षक दीपक पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे
स्वच्छता राखण्याचे आवाहन
मखमलाबाद गावची यात्रा नव्याने विकसित झालेल्या अमृत वनोद्यानात भरणार असून, या ठिकाणी अनेक वनौषधी झाडे तसेच हजारो झाडे लावण्यात आली आहेत. त्यामुळे या उद्यानाची काळजी घ्यावी, असे आवाहन माजी नगरसेवक पुंडलिकराव खोडे, माजी नगरसेविका सुनीता पिंगळे यांच्यासह निसर्गप्रेमी तुषार पिंगळे आणि नाशिक महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
कुस्त्यांची दंगल
मखमलाबाद येथील नागपंचमी यात्रेनिमित्त गावाजवळ कुस्त्यांची दंगल दुपारी भरणार आहे. यासाठी नाशिक शहरासह जिल्हाभरातून पहिलवान हजेरी लावतील. कुस्ती स्पर्धेसाठी खाऊच्या पुड्यापासून ते २१ हजार रुपयांपर्यंत बक्षिसे देण्यात येतात. त्यात काहीजण वैयक्तिक बक्षीसही देऊन कुस्ती लावतात. कुस्ती स्पर्धा बघण्यासाठी पंचक्रोशीतील हौशी प्रेक्षक हजेरी लावतात. यासाठी भव्य रिंगण तयार करण्यात येते. यावर्षी अनेकांनी स्वयंस्फूर्तीने कुस्ती स्पर्धेसाठी वर्गणी जमा केली आहे.

























