– महिनाभरात तिघांचा मृत्यू…
पंचवटी : प्रतिनिधी
मेरी रासबिहारी लिंक रोडवर अपघाताच्या घटना नित्याच्या झाल्या असून दोन ते तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या मागणीसाठी प्रभाग क्रमांक एक मधील नागरिकांसह सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी आरटीओ कॉर्नर येथे शुक्रवारी (दि.३) सकाळी अकरा वाजता रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त करण्यात आला. याबाबत उपस्थित नागरिकांच्या वतीने पंचवटी विभागीय कार्यालयाचे अभियंता समीर रकटे यांना निवेदन देण्यात आले.
मेरी रासबिहारी लिंकरोडवर दर पावसाळ्यात
जागोजागी खड्डे ही बाब नित्याची झाली आहे. मेरी – आरटीओ कॉर्नर ते रासबिहारी रोडवर साईनगर लेन नंबर एक ते पाच, राजमाता मंगल कार्यालय, श्रीराम नगर, स्वामी नगर, औदुंबर लॉन्स, अक्षता लॉन्स, अवधूत कॉलनी, अनुसया नगर, कळसकर नगर, बळीराज कॉलनी, गजानन कॉलनी, शुभम कॉलनी, माने नगर, दत्तात्रय चौक, म्हस्के नगर ,मीरा द्वार हॉल, शिवसागर कॉलनी, निर्मल नगर, साई शिव नगर, श्रीपाद कॉलनी, प्रमोद महाजन उद्यान, के.के. वाघ कृषी महाविद्यालय, श्री चक्रधर नगर, सरस्वती नगर आदी लोक वस्तीचा भाग आहे.
या भागाचा विकास झपाट्याने होत असून मेरी – रासबिहारी लिंक रोड हा दिंडोरी रोड व मुंबई महामार्गास जोडणारा रस्ता आहे. या मार्गाने अवजड तसेच चारचाकी दुचाकी या वाहनांची नेहमी वर्दळ असते. या मार्गावर रस्त्यावरील मोठं मोठे खड्डे पडले असून गेल्या महिन्याभरात अपघाताच्या घटना घडल्या. यात हितेश पाटील, गायत्री सोनवणे,व रिक्षाचालक सुनील आहिरे या तिघांचा मृत्यू झाला. या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या मागणीसाठी प्रभाग क्रमांक एक मधील नागरिकांनी आरटीओ कॉर्नर सिग्नल वर रास्ता रोको आंदोलन केले. तसेच नाशिक महापालिकेचे पंचवटी विभागीय कार्यालयाचे बांधकाम विभागाचे समीर रकटे यांना निवेदन देण्यात आले. तसेच म्हसरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांना देखील निवेदन देण्यात आले.
या रस्त्याची समीर रकटे पहाणी केली व १५ दिवसात साईड पट्टी व खड्ड्याचे काम पूर्ण केले जाईल. तसेच दिपावलीनंतर संपूर्ण रस्ता काँक्रीटीकरण करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी आंदोलनात अपघातात मृत्यू झालेल्या तिघांचे नातेवाईक, जेष्ठ नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यात सुनिल निरगुडे, प्रवीण जाधव, रवी गायकवाड, कॉ राजू देसले, राहुल सानप, विशाल कदम, विवेक नागरे, योगेश कापसे, पिंटू पाटील, महेंद्र बडवे, दिलीप मोरे, सागर लामखेडे, तुषार भोसले, सुनिल परदेशी, भाऊसाहेब नेहरे, हार्दिक निगळ, हर्षल पवार,भावनेश राऊत, निखील गायकवाड, गणेश थेटे, संतोष पेलमहाले, राहुल तेलुरे, महेश संत, रोहन तांबे, गौरव पलंगे, सतीश वावीकर, प्रल्हाद कुमावत, स्वाती पाटील, मनीषा पाटील, शोभा दिवे आदी सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























