पंचवटी – विशेष प्रतिनिधी
शहर व ग्रामीण परिसरात होत असलेली संततधार, गंगापूर धरणातून होणारा विसर्ग यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पूराचे मापक समजल्या जाणाऱ्या दुतोंडी हनुमानाच्या छातीपर्यंत पाणी पोहचले आहे. तर रामसेतू पुलालाही पाणी टेकले आहे.
राज्यासह नाशिकमध्ये संततधार सुरु आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने गंगापूर धरणातून बुधवारी (दि.२०) सकाळी आठ वाजता ५०० क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला. एक तासानंतर हा विसर्ग १५०० क्युसेक्स करण्यात आला. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतलेली नव्हती. धरणातील विसर्ग व पावसाचे प्रमाण यामुळे गोदेच्या पाण्याची पातळी वाढतच गेली. त्यामुळे गोदाघाटावर फक्त पुराच्या पाण्याचे साम्राज्य होते.

(छाया – अथर्व फोटो)
यामुळे बुधवारी भरणारा आठवडे बाजारही गणेशवाडी रस्त्यावर हलवण्यात आला. रामकुंड, य.म. पटांगण, रामसेतू, रोकडोबा मंदिर, म्हसोबा पटांगण आदी भागात वाढलेली पाण्याची पातळी पहाण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. गोदाघाटावरील लहान मंदिरेही पाण्याखाली गेली असून काठावरील टपऱ्या हलवण्यासाठी लगबग सुरु होती. पावसाने विश्रांती न घेतल्यास गंगापूर धरणातून अधिक प्रमाणात विसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदाघाटावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.


























